संतोष थामेत यांच्या मागण्यांसाठी आयोगाने लावली मुंबईत बैठक, जिल्हाधिकारी,समाज कल्याण अधिकारी,CO ना हजर राहण्याचे पत्र
जळगाव जिल्ह्यात या आमरण उपोषणाची चर्चा

भुसावळ दि-१५/०६/२५, भुसावळ नगरपरिषदेच्या सफाई कामगारांच्या विविध प्रकारच्या न्याय व हक्कांच्या प्रलंबित मागण्यांबाबत दिनांक १०/०६/२०२५ पासुन अखिल भारतीय सफाई कामगार संघटना प्रदेश सचिव संतोष थामेत यांचे आमरण उपोषण सुरू होते. याच दरम्यान महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य ॲड धर्मपाल मेश्राम यांनी दिनांक ११ जून रोजी दुपारी भुसावळ नगरपरिषदेत भेट देऊन मुख्याधिकारी व नगरपरिषदेच्या इतर अधिकाऱ्यां समवेत आढावा बैठक घेऊन कामांची पाहणी केली होती.अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचे प्रदेश सचिव संतोष थामेत यांनी आयोगाचे सदस्य ॲड. धर्मपाल मेश्राम यांना भुसावळ नगरपरिषदेतील सफाई कामगारांच्या विविध प्रकारच्या न्याय व हक्कांच्या प्रलंबित मागण्यासाठी निवेदन दिलेले होते.
आयोगाशी मोबाईलवरून झालेले Audio संभाषण

त्याची त्याचवेळी जागीच दाखल घेऊन त्यांनी दिनांक 18 जून रोजी मुंबईतील आयोगाच्या कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक लावून सफाई कामगारांना न्याय देण्याचे आश्वासन दिलेले आहे. या बैठकीसाठी जिल्हाधिकारी जळगाव, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा नगरविकास अधिकारी, भुसावळ नगरपरिषद मुख्याधिकारी व नगरपरिषदेचे संबंधित आस्थापना विभाग प्रमुख यांना बोलावलेले आहे.
काल दिनांक १५ जून रोजी सामाजिक कार्यकर्ते विनोद सोनवणे यांनी उपोषणस्थळी भेट दिली होती.त्यानंतर पत्रकारांच्या माध्यमातून ॲड. धर्मपाल मेश्राम सदस्य अनुसूचित जाती जमाती आयोग, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांच्याशी मोबाईलवर संपर्क करून त्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेले संतोष थामेत यांचे उपोषण मागे घेण्यात आले आहे. अनुसूचित जाती आयोगाच्या सदस्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या विविध प्रकारच्या न्याय व हक्कांच्या मागण्या आता पूर्ण होणार असल्याचे संकेत मिळाल्याने भुसावळ नगरपरिषदेच्या सफाई कामगारांमध्ये प्रचंड उत्साहाचे,आनंदाचे व नवचैतन्याचे वातावरण निर्माण झालेले आहे. यात अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचे प्रदेश सचिव संतोष थामेत यांनी मोठ्या हिमतीने केलेले पाच दिवसांचे आमरण उपोषण यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे.

भुसावळच्या इतिहासात सर्वाधिक ५ दिवस चाललेले आमरण उपोषण यशस्वी होण्याच्या अंतिम टप्प्यात
हा या कामगार संघटनेचा मोठा विजय मानला जात आहे. कारण भुसावळ शहरात गेल्या काही वर्षांमध्ये इतक्या मोठ्या हिमतीने तब्बल पाच दिवसांचे आमरण उपोषण कोणत्याही संस्थेच्या किंवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी केलेले नव्हते. त्यामुळे या धाडसी आमरण उपोषणाची संपूर्ण जळगाव जिल्हाभरात चर्चा सुरू झालेली आहे. हा कामगारांच्या एकजुटीचा व समाजाच्या पाठिंब्याचा विजय असल्याची प्रतिक्रिया उपोषणकर्ते संतोष थामेत यांनी दिलेली आहे.
या आमरण उपोषणाच्या यशस्वीतेसाठी अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष राकेश बारसे, जिल्हा उपाध्यक्ष विजय तेजकर,जिल्हा महासचिव नरेश बिऱ्हाडे, बंटी नरवाडे , शहराध्यक्ष मयुर सुरवाडे ,राजेश वानखेडे ,मिलींद सोनवणे, गौरव नन्नवरे यांनी अहोरात्र पाठिंबा देत यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले आहे. यावेळी उपोषणस्थळी दिवसभर बसून सफाई कामगार महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.













